Friday, October 17, 2014

मतदार किस झाड की पत्ती ?

प्रत्येक परीक्षेत काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्याला ६५ टक्के मार्कांचे अप्रुप वाटणे स्वाभाविक आहे. याप्रमाणेच राज्यात ६३ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी हाती येताच माझ्यासारख्या मीडियामंडुकांनी हे प्रमाण मागील निवडणुकांपेक्षा कसे जास्त आहे, याचा हवाला देत बडबड सुरू ठेवली. पण, मतदानाचे प्रमाण का वाढत नाही, मतदान या राष्ट्रीय कार्यापासून चार हात लांब राहणे पसंत का करतात, याचा ऊहापोह झालाच नाही.
.....
बुधवारी म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी राज्यभरात मतदान पार पडले. "पार पडले' हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण मतदार किंवा महाराष्ट्र याबद्दल एकाही राजकीय नेत्याला काहीही देणेघेणे नाही, हे त्यांनीच कृतीतून दाखवून दिले आहे. मतदान होताच वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोलच्या तोफा धडाडू लागल्या. कुणाला किती जागा मिळणार हे ठासून सांगत महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाचा बाजूने असेल, यावर चर्चाही सुरू झाल्या. राज्यात मतदानाची आकडेवारी किती टक्क्यांनी वाढली, त्याचा कुणाला अन् कसा लाभ होणार यावरही चर्वितचर्वण सुरू झाले. प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते आम्हीच योग्य कसे, याचीच टिमकी वाजवत राहिले. मात्र, या गदारोळात मतदानादिवशी दुपारपर्यंत घराबाहेर का पडले नाहीत, त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी कार्यकर्त्यांना का आटापिटा करावा लागला, यावर कुणीही चकार शब्दही काढला नाही. सत्तेच्या हव्यासापायी युती आणि आघाडी तोडणाऱ्या नेत्यांनीही यावर विचार केलाय की नाही, हेही त्यांनाच ठावूक !
राज्याला सक्षम नेतृत्व देऊ शकेल, असा नेता एकाही पक्षात नसल्यामुळे सर्वच पक्षांनी आपली लंगडी बाजू झाकण्यासाठी आणि सत्ता आपल्याच हाती यावी, यासाठी युती, आघाड्यांचा मार्ग चोखाळला. आता १५ ते २० वर्षांनंतर या पक्षांना पुन्हा स्वबळाचे स्वप्न पडले आहे. परंतु, युती आिण आघाडीच्या काळात एकत्र नांदणाऱ्या पक्षांनी आपणच कसा त्याग केला, इतर पक्षांचे सहकार्य न घेता सत्ता आपल्या हाती राखणे कसे शक्य होते, याबाबत ओरड सुरू केली. हा गोंधळ पाहून संभ्रमात पडलेल्या बहुतांश मतदारांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. याचे कारण काय असावे, याचा विचार करत असतानाच वृत्तपत्रांचे सप्टेंबर आिण ऑक्टोबर महिन्यातील अंक चाळले. त्यातील बातम्या पाहताना मतदार हा संभ्रमित झाले याचा उलगडा झाला. युती आणि आघाडी तुटण्यापूर्वीपासून जागावाटपासाठी चाललेले गुऱ्हाळ, घटस्फोट होताच सहकारी पक्षातील नेत्यांवर तोंडसुख घेण्याच्या बातम्यांनी सर्वच वृत्तपक्षांचे रकाने भरले होते. लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यांचे नाव पुढे करत मतांचा जाेगवा मागितला त्यांच्यावरच चिखलफेक करण्यात शिवसेनेसारख्या पक्षाने मागेपुढे पाहिले नाही. दुसरीकडे फक्त एक केंद्रीय मंत्री पद हाती असल्यामुळे त्यावर लाथ मारून एनडीएतून बाहेर पडण्याऐवजी हे पद कायम ठेवण्याचा मोहही शिवसेनेला आवरता आला नाही. हा दुटप्पीपणा पाहणाऱ्या राज्यातील मतदारांना काँग्रेस आिण राष्ट्रवादीनेही नाराज केले. सलग १५ वर्षे सत्तेची फळे चाखणाऱ्या या पक्षातील नेत्यांनी आघाडी तुटताच एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या. सिंचन घोटाळा आणि टगेगिरीप्रकरणाने मतदारांच्या रडारवर आलेल्या अजित पवारांनी लोकसभा निवडणुकांदरम्यान मतदारांना धमकावण्यासही मागेपुढे पाहिले नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनीही आदर्श प्रकरणातील काही मुद्यांबाबत आक्षेपार्ह विधान करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संस्कृती एकसारखीच असल्याचे दाखवून दिले. "बडे शहरों मे छोटी छोटी बाते होतीही हैं' असे म्हणणाऱ्या आबांनी तर घाणेरडेपणाचा कळसच गाठला. तरुणाई आिण नवमतदारांना अापल्याकडे खेचेल, असे वाटणाऱ्या मनसेनेही फक्त "मिशन टीका' सुरू ठेवली. मला सत्ता नको, म्हणत राज्यात जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्नही केला. त्यादरम्यान आलेले जाहीरनामे आणि ब्लू प्रिंट काहीच करिष्मा दाखवू शकल्या नाहीत. राज्याच्या निर्मितीपासून कायम असणारे रस्ते, पाणी आणि वीज हे प्रश्न सोडवण्याची ग्वाही देणाऱ्या पक्षांना त्याची लाजही वाटली नाही.
या गलबल्यात सामान्य माणूस कुठेच नव्हता, त्याच्या अडचणी, त्याचे प्रश्न त्याच्यापुरतेच राहिले. तो कसा जगतोय, शेतकरी आत्महत्या का करताहेत, यंदाही पाऊस नाही मग पिकांचे काय, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाचे उत्तर कोणते, कमी पगारात गरजा भागवताना यंदा कोणत्या खर्चांना कात्री लावायची असे एक ना दोन हजार प्रश्न सोडवताना तोंडाला फेस येणाऱ्या मराठी माणसाला वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांवर "मराठी अस्मिता' आिण "पाठीत खंजीर खुपसला' असे भुक्कड शब्द ऐकून घ्यावे लागत होते. सत्तेसाठी चाललेली ही चिखलफेक पाहता ही निवडणूक मला, माझ्या कुटुंबाला आणि समाजाला चांगले दिवस यासाठी आहे. निवडणुकीमुळे समाजाचे काही भले होणार आहे, असे मतदारांना वाटलेच नसावे. बहुदा त्यामुळेच मरो ते पक्ष आिण नेते असे म्हणत सुज्ञांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले असावे. कारण कुणालाही मत दिले तरी पुन्हा पाच वर्षांनी रस्ते, पाणी देणार असे सांगणारे रिक्षा रस्तोरस्ती फिरणार आहेतच !

Tuesday, September 16, 2014

चला वाचवू पश्चिम घाट

पश्चिम घाटातील जैवविविधता टिकून राहावी, यासाठी अनेक भाषांतील वृत्तपत्रांसह  टीव्ही, रेडिओच्या माध्यमातूनही जनजागृती होत आहे. पश्चिम घाट वाचवणे अत्यावश्यक असून त्यासाठी योजावयाच्या उपायांच्या तसेच नेमलेल्या समित्यांसह गुंडाळलेल्या अहवालांबाबतही सातत्याने बातम्या येतात. मात्र, पश्चिम घाटाचे नेमके स्वरूप, तेथील जैवविविधता वाचवणे का आवश्यक आहे, याबाबत नव्या पिढीला परिपूर्ण माहिती मिळावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ते स्वरूप समजल्याशिवाज तुमची माझी पिढी हा घाट वाचवण्याबाबत सजग होणार नाही. अर्थात नेटसॅव्ही मंडळी निरनिराळ्या माध्यमांतून पश्चिम घाटांबाबत माहिती देत आहेत. मात्र, ती एकाच ठिकाणी संकलीत केलेली नसल्यामुळे तुकड्यातुकड्यांतून मिळणारी माहिती अपुरी ठरत आहे.
मागच्या रविवारी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजीच्या मराठी वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमधून हा विषय पुन्हा चर्चिला गेला. नििमत्त होते केंद्रातील आघाडी शासनाप्रमाणेच मोदी सरकारमधील पर्यावरण व वनखात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतलेल्या निर्णयांचे. दै. दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीमध्ये अभिलाष खांडेकर यांनी म्हटले होते, जावडेकरांच्या खात्याने माधव गाडगीळ समिती व कस्तुरीरंगन समिती या दोन्ही अहवालांना बासनात गुंडाळून टाकले आहे. डॉ. मनमोहनसिंग सरकारने जसे संबंिधत सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्व देऊ केले होते व पश्चिम घाटात खाणकाम, िनर्माण व अन्य ‘विकासकामे’ सुरू ठेवण्याची बंधने सैल केली होती, त्याच मार्गावर मोदी सरकारसुद्धा, आता अिधक वेगाने मार्गक्रमण करत असल्याचे भयावह िचत्र समोर येत आहे. सहा दक्षिण-पश्चिम राज्यांना, अर्थात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा व गुजरात-महाराष्ट्र यांना स्वत:ची अशी नवी पाहणी करण्याची मुभा आधी वीरप्पा मोईली यांनी २०१३मध्ये िदली होती, ती आता जावडेकरांनी कायम ठेवली आहे. ही निश्चितच खेदजनक बाब आहे. याचमुळे जवळजवळ १६०० िक.मी.चा पश्चिम घाट पुन्हा एकदा खदखदतोय, न्याय मागतोय...
हा लेख वाचल्यानंतर पश्चिम घाट नेमका आहे, तरी कसा हे जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे मी गुुगलवर काही वेळ शोध घेतला. त्यात विकिपीडियापासून फेसबुकपर्यंत विविध ठिकाणी या विषयावरील मजकूर मिळाला. देशभरासह जगभरातील मराठी वाचकांना हा मजकूर एकाच ठिकाणी देता आला तर.... अशी कल्पना सुचल्यामुळे मी शक्य तो मजकूर आणि संबंधित पानांच्या लिंक्स या लेखासोबत देत आहे. हा लेख वाचणाऱ्या मित्रांना एकच विनंती आहे, की पश्चिम घाटाविषयी आणखी सकस लेखन किंवा उपक्रमांची माहिती असेेल तर ती माहिती आवर्जून शेअर करावी.
...........
०१ ) विकिपीडियामध्ये म्हटले आहे, सह्याद्री पर्वतरांग किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम तटाशेजारी उभी आहे. ही रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी चालू होते आणि अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची ही पर्वतरांग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाच्या जवळ पोचते. या पर्वतरांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो.[१] या पर्वतरांगेचे क्षेत्रफळ ६०,००० वर्ग कि.मी. असून या पर्वतरांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे [२]. अनेक उंच शिखरे ही पर्वतरांग सामावून घेते, त्यामध्ये रांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची १६४६ मी), महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची २६९५ मी). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. पर्वतरांगेत महत्त्वाचा खंडभाग पलक्कड खिंडीच्या स्वरुपात आहे जी तमिळनाडू आणि केरळ यांना जोडते. इथे सह्याद्रीची सर्वात कमी उंची आहे (३०० मी). पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक आहे. इथे ५००० पेक्षा जास्त फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती, १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात.[३]
पश्चिम घाट ही पर्वतरांग नसून दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेली कड आहे. सुमारे १५० दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यांमुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. या तुकड्याची पश्चिमेकडची बाजू साधारण १००० मी. उंचीचा कडा असावा असे शास्त्रज्ञांना वाटते [४].
गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारतीय उपखंडाची जमीन ही सरकत सरकत युरेशियन उपखंडाला जिथे येऊन मिळाली, तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून निघालेला लाव्हा सुमारे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले. या लाव्हामुळे जे खडक निर्माण झाले त्यांना बसाल्ट खडक असे म्हणतात. त्याखालील खडक हे सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेले जुने खडक आहेत व ते निलगिरीच्या काही भागांमध्ये सापडतात..[५]
बेसाल्ट खडक हा सह्याद्री पर्वतरांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक आहे. सह्याद्रीमध्ये सापडणारे इतर खडक पुढीलप्रमाणे चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट खडक दक्षिणेकडील पर्वतरांगांमध्ये आढळतात.[६]
पर्वतशिखरे
सह्याद्री पर्वतरांग उत्तरेला सातपुडा पर्वतरांगेपासून सुरू होते. नंतर दक्षिणेला गोवा, कर्नाटक, केरळ व शेवटी तमिळनाडू राज्यामध्ये पसरलेली आहे. यातील मुख्य रांग म्हणजे सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी, कुद्रेमुख व कोडागु इत्यादी थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. निलगिरी पर्वतरांग, बिलिगिरीरंगन पर्वतरांग, सेर्वरायन पर्वतरांग आणि तिरुमला पर्वतरांग इत्यादी काही छोट्या पर्वतरांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडतात.
कळसुबाई शिखर
काही छोट्या पर्वतरांगा उदा. कार्डमम पर्वतरांग व निलगिरी पर्वतरांग या तमिळनाडू राज्याच्या उत्तर-पश्चिम क्षेत्रात आहेत. निलगिरी पर्वतरांगेमध्ये प्रसिद्ध उटकमंड हे थंड हवेचे ठिकाण आहे. या पर्वतरांगेमध्ये दोड्डाबेट्टा (२,६२३ मी) हे सर्वोच्च शिखर आहे. या पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे, अनामलाई पर्वतरांगे मध्ये अनाई मुदी (२,६९५ मी), चेंब्रा शिखर (२,१०० मी), बाणासूर शिखर (२,०७३ मी), वेल्लारीमाला शिखर (२,२०० मी) आणि अगस्त्यमाला शिखर (१,८६८ मी) इत्यादी पर्वतशिखरे आहेत. केरळ राज्यातील सर्व चहा व कॉफीचे मळे हे पश्चिम घाटातच आहेत. पश्चिम घाटात दोन मुख्य खिंडी आहेत. गोवा खिंड जी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मध्ये आहे व दुसरी पलक्कड खिंड जी निलगिरी व अनामलाई पर्वतरांगांच्या मध्ये आहे.
निलगिरी पर्वतरांग
पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीच्या उत्तरेकडील सपाट भागाला कोकण असे म्हणतात. तर दक्षिणेला मलबार किंवा मलबार किनारा असे म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या भागाला महाराष्ट्रात देश असे म्हणतात तर मध्य कर्नाटकात मळनाड म्हणतात.
पश्चिम घाट मौसमी वाऱ्यांना अडवतो, त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होतात व पाउस पडतो. घनदाट जंगलेही पावसाला मदत करतात. तसेच जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्या स्वरुपात हवेत सोडण्यास मदत करतात. यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा जास्त पाउस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या इथेच उगम पावतात.
नद्या व धबधबे
जोग धबधबा (कर्नाटक) हा भारतातील एक प्रेक्षणीय धबधबा आहे.
पश्चिम घाट हा अनेक लहान मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. या पैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी, कृष्णा व कावेरी. या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तसेच इतर अनेक नद्या ज्या पश्चिमवाहिन्या आहेत, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यापैकी मुख्य नद्या म्हणजे मांडवी व झुआरी नदी. इतर अनेक नद्या या पश्चिम घाटात उगम पावतात. छोट्य नद्यांमध्ये भीमा नदी, मलप्रभा नदी, कुंडली नदी, इ. प्रमुख नद्या आहेत.
अनेक पश्चिमवाहिनी नद्या ह्या खूप उतारावरून वाहत असल्यामुळे जलविद्युत प्रकल्पांसाठी खूप उपयुक्त आहेत. पश्चिम घाटात जवळजवळ ५० धरणे बांधलेली आहेत व त्यापैकी सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे १९०० साली बांधला गेला.[७] या सर्व धरणांपैकी मोठी धरणे म्हणजे महाराष्ट्रातील कोयना धरण, केरळमधील परांबीकुलम धरण व कर्नाटकातील लिंगणमक्की धरण.
पावसाळ्यात पश्चिम घाटाचे सौंदर्य वाढविण्यास कारणीभूत घटक म्हणजे धबधबे. पश्चिम घाटात अनेक प्रेक्षणीय धबधबे आहेत. उदा. जोग धबधबा, कुंचीकल धबधबा, शिवसमुद्रम धबधबा व उंचाल्ली धबधबा. जोग धबधबा हा दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे व तो जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.[८] तळकावेरी वन्यजीव अभयारण्य हे कावेरी नदीच्या उगमाजवळ असलेले एक मोठे अभयारण्य आहे. तसेच घनदाट जंगलांमुळे तुंगभद्रा नदीच्या उगमापाशी शरावती व सोमेश्वर ही दोन अभयारण्ये आहेत. हवामान
पश्चिम घाटातील वार्षिक पर्जन्यमान
पश्चिम घाटातील वातावरण हे उंचीनुसार बदलत जाते. कमी उंचीवर उष्ण व दमट हवामान असून जास्त उंचीवर (१५०० मी च्या वर) सरासरी १५ °से. तापमान असते. काही अति उंचीच्या भागांमध्ये कायम धुके असते व हिवाळ्यात तापमान ४-५ °से. पर्यंत खाली येते. पश्विम घाटातील सरासरी तापमान उत्तरेला २० °से व दक्षिणेला २४ °से आहे.[५]
पश्चिम घाटातील सरासरी पर्जन्यमान हे ३०००-४००० मी.मी. (कोकणात) व १००० मी.मी. (देशावर). पश्चिम घाटातील पावसाचे प्रमाण हे बदलत जाणारे आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला खूप पाऊस पडतो पण थोडेच दिवस पडतो तर विषुववृत्ताच्या जवळ असणाऱ्या प्रदेशांमध्ये थोडाच पाऊस पडतो पण वर्षभर पडतो.[५]
विकिपीडियावरील पूर्ण लेख पाहण्यासाठी http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80 लिंक वापरा.
.......................................................................................................
याच विषयावरील महत्वपूर्ण माहिती पुढील लिंक्सवर उपलब्ध आहे.
०१ ) http://marathivishwakosh.in/khandas/khand18/index.php?option=com_content&view=article&id=10312
०२ ) https://www.facebook.com/saveghatsmovement
०३ ) http://zeenews.india.com/marathi/news/exclusive/beauty-of-western-ghats/160347
०४) http://www.andolan-napm.in/content/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF
०५ ) http://www.marathimati.net/tag/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F/
०६ ) http://www.bharat4india.com/top-news/2012-11-21-11-17-01/30
०७ ) http://www.lokprabha.com/20120608/matitartha.htm
०८ ) http://www.loksatta.com/desh-videsh-news/environment-ministry-accepts-kasturirangan-report-on-western-ghats-unfortunate-dr-madhav-gadgil-228988/
०९ ) http://amrutmanthan.wordpress.com/
१० ) http://dainiksagar.com/node/53

Saturday, August 9, 2014

करंटेपणाने लादला दुष्काळ

पुढच्यास ठेच मागचा शाहणा या म्हणीचा अर्थ समजून न घेण्याच्या आपल्या वृत्तीने सलग दुसऱ्यांदा अवघा मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जलसंकट परतवण्यासाठी फारसे प्रयत्न न केल्यामुळेच पाण्यासाठी तोंड वेंगाडण्याची वेळ आपल्यावर आली आहे. या संकटाला फक्त राज्यकर्तेच नव्हे तर तुम्ही-आम्हीसुद्धा तितकेच जबाबदार आहोत.
.......
हे नाही...ते नाही असं म्हणत शासनाच्या नावानं खडे फोडण्याची सवयच आपल्याला लागली आहे. खड्डा पडला शासनानेच दुरुस्त करावा, पाऊस नाही झाला शासनानेच नुकसान भरपाई द्यावी अशा सवयींनी आपण पंगू होत आहोत, याची जाणीवही आपल्याला राहिलेली नाही. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या चटक्यांनी भाजून निघाला. गावागावात छावण्या सुरू झाल्या, दुष्काळी कामं सुरू झाली... वगैरे वगैरे. पण, हे संकट का ओढवलं, याचा विचार आपण केलाच नाही. मराठवाड्यातील दोन-पाच शहाणीसुरती गावं सोडली तर इतर बहुसंख्य गावं आज पुन्हा टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. वर ज्या दोन-पाच गावांचा उल्लेख केला, त्या गावांमध्ये जलसंवर्धनाचे प्रयत्न झाल्यामुळे आपले भाऊबंद टंचाईच्या जोखडातून मुक्त झाले. त्यांची कॉपीही वर्षभरात आपल्याला करता आलेली नाही. आता पावसाने डोळे वटारताच आपल्याला विद्वान राज्यकर्त्यांनी दुष्काळ जाहीर करा, असा टाहो सुरू केला. पण, दुष्काळ पडूच नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा प्रयत्न ना या राज्यकर्त्यांनी केला ना तुम्ही-आम्ही.
मराठवाड्यातील आठपैकी एकही जिल्हा पाण्याच्या बाबतीत सर्वार्थानं स्वयंपूर्ण नाही. याचं कारण निश्चयानं जलसंवर्धन न करणं हेच आहे. टंचाईच्या नावानं गळे काढणारे आपण पाणी जपून वापरण्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. जपून वापरणे तर सोडाच पाण्याची साठवण्यातही आपण कमी पडत आहोत. बीड जिल्ह्यातील परळी आणि शिरूर तालुका, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, जालना जिल्ह्याचा काही भाग वगळता कुठेही पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे कितीही पाऊस झाला तरी आपला घसा कोरडाच राहणार, हे निश्चित ! एकदा ठेच लागल्यावर तरी जलसंवर्धनासाठी प्रयत्न करण्याकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळेच यंदाही जलपातळी खालावल्याच्याच बातम्या प्रसिद्ध झाल्या. उस्मानाबाद जिल्हा वगळता इतर सातही जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. ती का ओढवली, याचे कारण आपल्याला माहित असूनही आपण त्याकडे पाठ करून उभे आहोत.  ही अनास्थाच आपल्याला मारक ठरणार आहे. जायकवाडी धरणात वर्षभर पिण्यास पुरेस इतके पाणी साठले, की आपण हुश्श करतो. मात्र, ज्या शेतकऱ्यांसाठी हे धरण बांधले होते, त्यांना पाणी मिळेल की नाही, याची चिंता आपण करतच नाही. माझं पोट भरलं की झालं ही वृत्ती अंगी बाणवल्यामुळे आपण इतके स्वार्थी झालो आहोत, की त्यासाठी ढोंग करायलाही आपण मागेपुढे पहात नाही. आपल्या भागात पाऊस झाला नाही, की वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडावं यासाठी आंदोलनं सुरू होतात. हक्काचं पाणी या गोंडस नावाखाली ऊर फुटेस्तोर आंदोलन करणारी ही मंडळी जलसंवर्धनासाठी मात्र पुढे येत नाहीत. अर्थात दोष फक्त त्यांचा नाहीच, आपणही तितकेच दोषी आहोत. पाणी साठवण्याकडे केलेले दुर्लक्ष आपल्या विनाशाकडे घेऊन जात आहे आणि आपण मात्र हक्काच्या पाण्याचे रडगाणे गात आहोत.
दै. दिव्य मराठीच्या मुख्य अंकात २९ जुलै २०१४ रोजी एक विशेष पान प्रकाशित झालं. या पानामध्ये जालना जिल्ह्यातील शिवनी या गावातील शेतकऱ्यांनी महत्तप्रयासानं केलेल्या जलसंवर्धनाची कहाणी प्रकाशित झाली. बीड जिल्ह्यातील लोळदगाव आणि उदंडवडगाव तसेच नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सांगवी बोरगावचे शेतकरी माधवराव गुंडूरे अशी चार-दोन उदाहरणं सोडली, तर टंचाईवर मात करण्यात शेतकरीही मागेच असल्याचे स्पष्ट होतं. मारहाण, अत्याचार असे प्रकार घडले की, न्यायाची मागणी लावून धरत सत्याग्रह करणाऱ्या समाजिक संघटनाही जलसंवर्धनाच्या लढ्यापासून दूरच आहेत. शासन आणि यंत्रणेबद्दल तर न बोललेच बरं, अशी परिस्थिती आहे. थोडक्यात काय, तर पावसाळा संपण्यास आणखी किमान महिना पंधरा दिवस शिल्लक आहेत, या काळात काही हालचाल केली तर भविष्यात टंचाईवर मात करणं शक्य होईल. त्या पुढील काळात उपलब्ध जलसाठा योग्य पद्धतीनं वापरण्याचा नियोजनही करता येईल. असे प्रयत्न झाले तरच पुढचे वर्ष तुमच्या माझ्या आयाबहिणींना पाण्यासाठी रानोमाळ हिंडावं लागणार नाही. अन्यथा आपल्याच करंटेपणानं पुन्हा दुष्काळ आपल्या मानगुटीवर बसेल.

Sunday, August 3, 2014

यवतमाळ शहरातील 78 वर्षांच्या तरुणाची यशोगाथा

 हातकागदाच्या वेडातून सुरू झाला प्रवास, जागतिक स्तरावर कार्याचे कौतूक 40 वर्षांच्या मेहनतीने बनले लष्कराचे एकमेव पुरवठादार
70 च्या दशकात केमिकल इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतरही गलेलठ्ठ पगाराची नोकरी लाथाडून एक तरुण परंपरात व्यवसायात रमला. या ध्येयवेड्याने 40 वर्षात स्वत:चा मूळ व्यवसाय भरभराटीला आणतानाच हातकागदाच्या क्षेत्रात ग्लोबल भरारी घेतली. यानंतरही तिथेच अडकून न पडता थेट लष्कराला विशिष्ट प्रकारच्या पुठ्ठ्यांचा पुरवठा करण्याचा प्रकल्प उभारून विदर्भातील एकमेव पुरवठादार होण्याचा मान मिळवला. ‘आंत्रप्रिनर’ हा शब्द रक्तात भिनलेल्या आणि व्यावासायिकाची कामात झोकून देण्याची वृत्ती आयुष्यभर अंगी बाणवणा ऱ्या त्या उद्योजकाचे नाव आहे, ओमप्रकाशजी अग्रवाल.1947 मध्ये जन्मलेल्या ओमप्रकाशजी यांनी केमिकल इंजिनियरींग पूर्ण केल्यानंतर मुंबई आणि नागपूरातील काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले. मात्र, परंपरागत व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांनी या नोकरीकडे पाठ फिरवली. 100 वर्षांपासून सुरू असलेल्या स्टेशनरीच्या व्यवसायात बदलत्या काळानुसार अनेक बदल केले. पुरवठादारांवर अवलंबून न राहता विविध प्रकारचे कागद तयार करण्याचा चंग बांधलेल्या ओमप्रकाशजींनी हातकागद बनवण्यावर लक्ष केंद्रीत केले. नवरंग पेपर्स नावाने 1979 मधे छोट्याशा जागेत हातकागद तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला. सुरुवातीच्या काही प्रयोगात अपयश आल्यानंतर या व्यवसायाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी 1982 मध्ये पुण्यातील हातकागद कारखाना गाठला. हे प्रशिक्षण आणि केमिकल इंजिनिअरींगची पदवी या शिदोरीवर असंख्य प्रकारचे हँडमेड पेपर तयार करण्यास सुरुवात केली. इतर व्यवसायिकांप्रमाणे परंपरागत पद्धतींचा वापर न करता सेमिआॅटोमॅटिक मशीन्स वापरून अनेक अभिनव प्रयोग केले
.....

ओमप्रकाशजी अग्रवाल
कागदांचे मनोहरी विश्व
आजवर कुणीही न वापरलेले 50 विविध प्रकारचे फायबर वापरून हातकागद तयार करण्याचा प्रयत्न करताना बांबू, केळीचा बुंधा, जिरे, निवडूंग, तुळस,गवती चहा, इंग्रजी चिंच, केतकी आदींचे हातकागद तयार केले. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी 40 कामगारांपा प्रशिक्षण दिले. 1982 पासून ते 90 च्या दशकापर्यंत देशातील प्रत्येक कोपऱ्यात नवरंग पेपर पोहोचवला. सुगंधी हातकागद बनवणारे ते देशातील एकमेव व्यावसायिक ठरले. त्या काळातील सुप्रसिद्ध कार्यक्रम सुरभीने या अभिनव उपक्रमाची नोंद घेतली. सिद्धार्थ काक यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर ओमप्रकाशी अग्रवाल हे नाव देशभरात पोहोचले. यानंतर केवळ हातकागद तयार न करता या कागदापासून ग्रिटींग्स, डायरी, लेटरपॅड्स बनवण्यावर अग्रवाल यांनी लक्ष केंद्रीत केले. राष्ट्रपती भवनातील विविध कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या निमंत्रणपत्रिका, देशोदेशीच्या वकिलातीतील अधिकाऱ्यांना पाठवयाची पत्रे आदींसाठी कागदही अग्रवाल यांनी पुरवला. विशेष म्हणजे, पंतप्रधान कार्यालयासाठी असे साहित्य बनवण्याकरिता देशभरातून नमुने मागणवण्यात आले होते. त्या वेळी इंदिरा गांधी यांनीही अग्रवाल यांनी तयार केलेल्या हातकागदाची निवड केली.
....
जागतिक बहुमान
आपल्या क्षेत्रातील इतर व्यावसायिकांना कमी न लेखता त्यांचे प्रयोग जाणून घेण्यासाठी 80 च्या दशकापासूनच देशपातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय कागद परिषदा आणि प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला. मुंबई, कलकत्ता आणि दिल्लीतील प्रदर्शनांमध्ये अनेक पुरस्कार पटकावले. फ्रंकफट येथे होणाऱ्या जागतिक दर्जाच्या वर्ल्ड आॅफ पेपर या प्रदर्शनात 2006,07 आणि 08 अशी सलग तीन वर्ष विजेत्याचा बहुमानही मिळवला. देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तब्बल 15 बक्षीसे त्यांनी पटकावली.
.....
लष्काराची कौतुकाची थाप
वाढता उत्पादन खर्च, कागदाची वाढती किंमत या चिंतांनी त्रासलेल्या ओमप्रकाशजी यांनी 1990 पासून इतर व्यवसायांचा शोध घेण्यास सुरुवात केली. लष्काराला बोफोर्स तोफांसाठी लागणाऱ्या सीडी कप, बॉम्ब डिस्क, आणि विशिष्ट प्लेट्स आयात कराव्या लागत. त्या तयार करण्याचा चंग ओमप्रकाशजी यांनी बांधला. यातूनच लष्कराचे पुरवठादार होण्याचा निर्णय घेत असे साहित्य बनणारे विदर्भातील एकमेव व्यावासयिक बनण्याचा निर्धार केला. तो पूर्ण करण्यासाठी पुन्हा जोमाने तयारी केली. लष्कराच्या  चंद्रपूर, भंडारा, पुणे, जबलपूर, भुसावळ, उटी आदी ठिकाणावरील कारखान्यांना ते असे साहित्य पुरवतात.
......
आणि कलामांची भेट झाली
20 सप्टेंबर 2004 रोजी चेन्नईतील डॉ. चेरिअन यांच्या रुग्णालयात अग्रवाल यांची बायपास शस्त्रक्रिया झाली. चेरिअन यांच्या स्टेम सेल लॅबच्या उद्घाटनासाठी दोनच दिवसांत तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम तिथे येणार होते. हे कळताच अग्रवाल यांनी त्यांची भेट घेण्याचा निश्चय केला. कलाम यांना भेट देण्यासाठी इंप्रेशन पद्धतीने तयार केलेले कलाम यांचे वडिल जैनलाबुदिन अब्दुल यांचे पोट्रेट तयार केले. मात्र, ऐनवेळी, अग्रवाल यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ही भेट टळली. मात्र, 2006 मध्ये पुन्हा भेटीचा योग जुळून आला. हातकागद आणि लष्काराला पुरवलेल्या साहित्यबाबत कलाम यांनी अग्रवाल यांचे कौतूक करून कामाची पूर्ण माहिती घेण्यासाठी अर्धा तास वेळही दिला.