जगणं खरवडून टाकणारा दुष्काळ !
पाच धा सालाआदी पहाटं झाली सगळ्यासनी गुरं चरायला सोडायची घाई व्हायाची. राती उशिरा दमून निजलेली कुणी अनसुया, रखमा किंवा लक्ष्मी घरधनी उठलेला पाहून आपुनबी कामाला लागायची. हगरी चांदनी उगवली की अाताबी गाव जागा होतो. पर, कामाच्या घाईन नव्हं तर कुणाच्या तरी जाण्याची बोंब उठल्यानं. कलागत व्हावी, चोरी व्हावी असं कुणाच्या कुडात काही राहल्यालं न्हाई. चार सालाआधी दुष्काळ पडला तिथंच पुंजीची राख झाली आता अंगाला फासायला तीबी उरली न्हाई. आता बोंब उठती ती कुणाच्या न कुणाच्या फाशी घेण्यानं किंवा पिकावर फवारायचं औषिध प्याल्यानं. हप्त्यात एकतरी मानूस जानार अन् गावात कालवा उठणारं हे समद्यासनी तोंडपाठ झालयं. दिस उगवताच पारावर माणसं गोळा व्हत्यात, कशानं गेला वो रामा असं कुणीस बोललचं तर मानसं खुळ्यागत त्याच्याच तोंडाकडं पाहत्यात. आज कुंभाराच्या गल्लीत तर उद्या मांगाच्या वस्तीत रोज कुठं न कुठं रडारड अन् कालवा. तासा दोन तासांत पंचनामा झाला की पै पाहुने पसार हुत्यात. कच्च्याबच्च्यांसाठी कुणी पदरं पसरलाच तर त्यात काय टाकायचं या ईचारानं त्यांचही तोंड काळठिक्कर पडतं. आठ दिवसांतच हा ईषय जुना होतो अन्् गाव पु...