Wednesday, July 22, 2015

छोट्या रकमेच्या कर्जाची मोठी गोष्ट

आर्थिक सुबत्ततेची फळे चाखणाऱ्या आपल्या देशातील अर्धिधिक लोकसंख्या अजूनही दारिद्र्यातच जगते आहे. समाजाचा काही भाग शिक्षणाच्या जाेरावर प्रगतीच्या लाटेवर स्वार झालेला असतानाच अज्ञानातून आलेलं दारिद्र्य आणि पिढ्यान पिढ्या दारिद्र्याशी झगडण्यामुळं पुन्हा अज्ञानाच्या अंध:कारात चाचपडणाऱ्या गरिबांपुढे रोजच्या जगण्याचाच प्रश्न असतो. आपल्या आसपासच्या देशांची परिस्थितीही थोड्याफार फरकाने अशीच आहे. परतफेडीची शक्यता नगण्य असल्यामुळे बँकांही या लाेकांना नजरेआड करतात. त्यामुळे जगण्याचे साधन शोधण्यातच हयात खर्ची पडणारी ही माणसे अशीच खितपत पडतात. या भणंगांना जगण्यासाठी बळ देत आर्थिक बळ देणाऱ्या बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या ग्रामीण बँकेच्या प्रयोगाची जगभरात वाहवा झाली. युनूस यांचा नोबेल पुरस्काराने गौरव झाला त्याच सुमारास भारतातही अशाच एका प्रयोगाची मुहूर्तमेढ रोवली जात होती.

      साधारणत: डिसेंबर २००६ चा हा काळ होता. युकेमध्ये कार्यरत असणारे रामक्रिष्णा एनके आणि स्मिता रामक्रिष्णा या दोघांनी परदेशातील नोकरी सोडून भारतात सामाजिक काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. बालमजुरी रोखण्यासह विशेष मुलं आणि शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी ठोस प्रयत्न करण्याचा निर्धार करत स्वदेशात परतलेल्या या जोडगोळीनं या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा निर्धार केला. या दोघांची धडपड बघून नियती टेक्नॉलाजीनं मदतीचा हात पुढे केला. वर्षभरानंतर म्हणजेच ऑगस्ट २००७ मध्ये मायक्रोफायनान्स इंडिया समिटमध्ये सहभागी झालेल्या ‘रंग दे’च्या संस्थापकांना अनेकांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. इथूनच सुरू झाला छोट्या रकमेच्या कर्जाचा मोठा प्रवास !
     सुरुवातीच्या काळात गरजूंचा शोध घेतानाच त्यांना द्यावयाच्या कर्जासाठी सामाजिक गुंतवणूकदारांना आवाहन करण्यास सुरुवात केली. गरजूंची माहिती वेबसाईटवर देत सामान्यांना गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. ही रक्कम व्याजासह परत करण्याची हमी ‘रंग दे’ने घेतली. २००७ नंतर कॉर्पोरेट जगतानं या उपक्रमाची नांेद घेत मदतीचा हात पुढे केला. विविध परिषदा, मेळावे आणि संशोधन कार्यशाळांतून देशभरातील अनेक संस्था ‘रंग दे’सोबत जोडल्या गेल्या. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून या कर्जदारांना वित्त पुरवठा केला.
१५ राज्यातील २९ संस्थानी ‘रंग दे’च्या माध्यमातून अनेकांना हक्काचा रोजगार मिळवून दिला आहे. एकूण कर्ज वितरणापैकी ९४ टक्के कर्ज महिलांना वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे वाढत्या थकबाकीमुळे अनेक मोठ्या वित्तसंस्था अडचणीत आल्या असताना ९९.७९ टक्के कर्जदारांनी ‘रंग दे’च्या कर्जाची व्याजासह परतफेड केली आहे. सहा फिल्ड पार्टनर्सच्या माध्यमातून ‘रंग दे’ने आत्तापर्यंत एकट्या महाराष्ट्रातील ६८६२ जणांना १५ कोटी ३९ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. जळगाव जिल्ह्यातील भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन, यवतमाळची समग्र ग्राम विकास संस्था, रायगडचे लक्ष्मी कॉलेज आॅफ आॅप्टोमेस्ट्री, पुण्यातील पर्वती स्वयंरोजगार संस्था आणि विज्ञान आश्रम, सोलापुरातील सखी समुदाय कोष या निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सहा संस्था ‘रंग दे’नेच्या सहाय्याने अनेकांच्या जीवनात आनंद फुलवत आहेत.
     बचत गटांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील महिलांना जगण्याची दिशा दाखवणाऱ्या आणि सन २०११ च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांची भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन (बीएनजीव्हीएन) ही संस्थाही ‘रंग दे’ची फिल्ड पार्टनर म्हणून कार्यरत आहे. मिश्रा यांच्या संस्थेने ७४३ कर्ज प्रकरणात ९ कोटी ९९ लाख ५ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. परतफेडीची टक्केवारी ९६.३६ टक्के आहे.

‘रंग दे’ वाटचालीबाबत संस्थेचे प्रेसिडेंट चैतन्य नाडकर्णी सांगतात, चॅरिटी नव्हे तर गुंतवणूक म्हणून गरजूंना मदत करण्याच्या संकल्पनेला सामान्यांनी दाद दिली. साडेसात वर्षांतील आकडेवारी पाहिली तर २५ कंपन्यांच्या योगदानापेक्षा सामान्य गुंतवणूकदारांनीच मोलाची साथ दिली हे स्पष्ट होते. महिनाभरात पुणे, पालघर, धुळे अणि वर्ध्यातील संस्थांसोबत काम सुरू करत आहोत. तेथेही असाच अनुभव येईल, याची खात्री आहे.

No comments:

Post a Comment