करंटेपणाने लादला दुष्काळ
पुढच्यास ठेच मागचा शाहणा या म्हणीचा अर्थ समजून न घेण्याच्या आपल्या वृत्तीने सलग दुसऱ्यांदा अवघा मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जलसंकट परतवण्यासाठी फारसे प्रयत्न न केल्यामुळेच पाण्यासाठी तोंड वेंगाडण्याची वेळ आपल्यावर आली आहे. या संकटाला फक्त राज्यकर्तेच नव्हे तर तुम्ही-आम्हीसुद्धा तितकेच जबाबदार आहोत. ....... हे नाही...ते नाही असं म्हणत शासनाच्या नावानं खडे फोडण्याची सवयच आपल्याला लागली आहे. खड्डा पडला शासनानेच दुरुस्त करावा, पाऊस नाही झाला शासनानेच नुकसान भरपाई द्यावी अशा सवयींनी आपण पंगू होत आहोत, याची जाणीवही आपल्याला राहिलेली नाही. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या चटक्यांनी भाजून निघाला. गावागावात छावण्या सुरू झाल्या, दुष्काळी कामं सुरू झाली... वगैरे वगैरे. पण, हे संकट का ओढवलं, याचा विचार आपण केलाच नाही. मराठवाड्यातील दोन-पाच शहाणीसुरती गावं सोडली तर इतर बहुसंख्य गावं आज पुन्हा टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. वर ज्या दोन-पाच गावांचा उल्लेख केला, त्या गावांमध्ये जलसंवर्धनाचे प्रयत्न झाल्यामुळे आपले भाऊबंद टंचाईच्या जोखडातून मुक्त झाले. त्यांची...