Friday, October 17, 2014

मतदार किस झाड की पत्ती ?

प्रत्येक परीक्षेत काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्याला ६५ टक्के मार्कांचे अप्रुप वाटणे स्वाभाविक आहे. याप्रमाणेच राज्यात ६३ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी हाती येताच माझ्यासारख्या मीडियामंडुकांनी हे प्रमाण मागील निवडणुकांपेक्षा कसे जास्त आहे, याचा हवाला देत बडबड सुरू ठेवली. पण, मतदानाचे प्रमाण का वाढत नाही, मतदान या राष्ट्रीय कार्यापासून चार हात लांब राहणे पसंत का करतात, याचा ऊहापोह झालाच नाही.
.....
बुधवारी म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी राज्यभरात मतदान पार पडले. "पार पडले' हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण मतदार किंवा महाराष्ट्र याबद्दल एकाही राजकीय नेत्याला काहीही देणेघेणे नाही, हे त्यांनीच कृतीतून दाखवून दिले आहे. मतदान होताच वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोलच्या तोफा धडाडू लागल्या. कुणाला किती जागा मिळणार हे ठासून सांगत महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाचा बाजूने असेल, यावर चर्चाही सुरू झाल्या. राज्यात मतदानाची आकडेवारी किती टक्क्यांनी वाढली, त्याचा कुणाला अन् कसा लाभ होणार यावरही चर्वितचर्वण सुरू झाले. प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते आम्हीच योग्य कसे, याचीच टिमकी वाजवत राहिले. मात्र, या गदारोळात मतदानादिवशी दुपारपर्यंत घराबाहेर का पडले नाहीत, त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी कार्यकर्त्यांना का आटापिटा करावा लागला, यावर कुणीही चकार शब्दही काढला नाही. सत्तेच्या हव्यासापायी युती आणि आघाडी तोडणाऱ्या नेत्यांनीही यावर विचार केलाय की नाही, हेही त्यांनाच ठावूक !
राज्याला सक्षम नेतृत्व देऊ शकेल, असा नेता एकाही पक्षात नसल्यामुळे सर्वच पक्षांनी आपली लंगडी बाजू झाकण्यासाठी आणि सत्ता आपल्याच हाती यावी, यासाठी युती, आघाड्यांचा मार्ग चोखाळला. आता १५ ते २० वर्षांनंतर या पक्षांना पुन्हा स्वबळाचे स्वप्न पडले आहे. परंतु, युती आिण आघाडीच्या काळात एकत्र नांदणाऱ्या पक्षांनी आपणच कसा त्याग केला, इतर पक्षांचे सहकार्य न घेता सत्ता आपल्या हाती राखणे कसे शक्य होते, याबाबत ओरड सुरू केली. हा गोंधळ पाहून संभ्रमात पडलेल्या बहुतांश मतदारांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. याचे कारण काय असावे, याचा विचार करत असतानाच वृत्तपत्रांचे सप्टेंबर आिण ऑक्टोबर महिन्यातील अंक चाळले. त्यातील बातम्या पाहताना मतदार हा संभ्रमित झाले याचा उलगडा झाला. युती आणि आघाडी तुटण्यापूर्वीपासून जागावाटपासाठी चाललेले गुऱ्हाळ, घटस्फोट होताच सहकारी पक्षातील नेत्यांवर तोंडसुख घेण्याच्या बातम्यांनी सर्वच वृत्तपक्षांचे रकाने भरले होते. लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यांचे नाव पुढे करत मतांचा जाेगवा मागितला त्यांच्यावरच चिखलफेक करण्यात शिवसेनेसारख्या पक्षाने मागेपुढे पाहिले नाही. दुसरीकडे फक्त एक केंद्रीय मंत्री पद हाती असल्यामुळे त्यावर लाथ मारून एनडीएतून बाहेर पडण्याऐवजी हे पद कायम ठेवण्याचा मोहही शिवसेनेला आवरता आला नाही. हा दुटप्पीपणा पाहणाऱ्या राज्यातील मतदारांना काँग्रेस आिण राष्ट्रवादीनेही नाराज केले. सलग १५ वर्षे सत्तेची फळे चाखणाऱ्या या पक्षातील नेत्यांनी आघाडी तुटताच एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या. सिंचन घोटाळा आणि टगेगिरीप्रकरणाने मतदारांच्या रडारवर आलेल्या अजित पवारांनी लोकसभा निवडणुकांदरम्यान मतदारांना धमकावण्यासही मागेपुढे पाहिले नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनीही आदर्श प्रकरणातील काही मुद्यांबाबत आक्षेपार्ह विधान करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संस्कृती एकसारखीच असल्याचे दाखवून दिले. "बडे शहरों मे छोटी छोटी बाते होतीही हैं' असे म्हणणाऱ्या आबांनी तर घाणेरडेपणाचा कळसच गाठला. तरुणाई आिण नवमतदारांना अापल्याकडे खेचेल, असे वाटणाऱ्या मनसेनेही फक्त "मिशन टीका' सुरू ठेवली. मला सत्ता नको, म्हणत राज्यात जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्नही केला. त्यादरम्यान आलेले जाहीरनामे आणि ब्लू प्रिंट काहीच करिष्मा दाखवू शकल्या नाहीत. राज्याच्या निर्मितीपासून कायम असणारे रस्ते, पाणी आणि वीज हे प्रश्न सोडवण्याची ग्वाही देणाऱ्या पक्षांना त्याची लाजही वाटली नाही.
या गलबल्यात सामान्य माणूस कुठेच नव्हता, त्याच्या अडचणी, त्याचे प्रश्न त्याच्यापुरतेच राहिले. तो कसा जगतोय, शेतकरी आत्महत्या का करताहेत, यंदाही पाऊस नाही मग पिकांचे काय, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाचे उत्तर कोणते, कमी पगारात गरजा भागवताना यंदा कोणत्या खर्चांना कात्री लावायची असे एक ना दोन हजार प्रश्न सोडवताना तोंडाला फेस येणाऱ्या मराठी माणसाला वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांवर "मराठी अस्मिता' आिण "पाठीत खंजीर खुपसला' असे भुक्कड शब्द ऐकून घ्यावे लागत होते. सत्तेसाठी चाललेली ही चिखलफेक पाहता ही निवडणूक मला, माझ्या कुटुंबाला आणि समाजाला चांगले दिवस यासाठी आहे. निवडणुकीमुळे समाजाचे काही भले होणार आहे, असे मतदारांना वाटलेच नसावे. बहुदा त्यामुळेच मरो ते पक्ष आिण नेते असे म्हणत सुज्ञांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले असावे. कारण कुणालाही मत दिले तरी पुन्हा पाच वर्षांनी रस्ते, पाणी देणार असे सांगणारे रिक्षा रस्तोरस्ती फिरणार आहेतच !